का ?
जगरहाटी समजून पचवून स्थिरावण्याआधी डोक्यात अनेक प्रश्नांचे काहूर माजत असतात. सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतात असे नाही. काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे जगण्यासाठी गरजेचे नसते. असे प्रश्न अनुत्तरीतच राहतात अन कालबाह्य होऊन जातात .
प्रत्येकच नात्याचे काही नाव असते का?
प्रत्येक जाणिवेचे काही अस्तित्त्व असते का?
घटका जाते, पळे जातात, तास ठणाठणा वाजत असतो
काळ त्याच्या वेगाने सतत पुढे धावत असतो
या जीवनचक्रात काही क्षणांचे खरंच मोल असते का?
समुद्रात वादळ येते लाटा किनारा ग्रासू लागतात
वाटेमधील खडकांवर थेंबांचा वर्षाव करतात
या थेंबांच्या वियोगाचे समुद्रास दुःख असते का?
मनाच्या वेलीवर हजारो पालव्या फुटतात
काही सैरावैरा धावतात, काही जागेवरच थबकतात
खुरटलेल्या भावनांचे कोणाला वैषम्य असते का?
पौर्णिमा ढेरे

Comments
Post a Comment